जिल्ह्यातील रिक्त जागेवर कर्तव्यदक्ष अधिका-यांची तात्काळ नेमणूक करा lokpravah

वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


गडचिरोली : जिल्ह्यात प्रशासनातील अर्धे अधिक अधिका-यांची महत्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारींच्या भरोशावर विविध विभागातील कामकाज चालढकल सूरू आहे परंतु प्रभारी अधिकारी नियमीत कार्यालयात उपस्थित नसल्याने विविध योजनेची अनेक नागरिकांची कामे रखडली आहेत त्यामूळे कर्तव्यदक्ष अधिका-यांची नेमणूक रिक्त असलेल्या जागेवर तात्काळ करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिका-यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने नुकतीच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले, यावेळी शिष्ठमंडळात महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख , शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संघटक भारत रायपूरे, आबिद शेख , भोजराज रामटेके, मनोहर कुळमेथे, जावेद शेख आदिंचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात ज्या अधिका-यांची नियुक्ती केल्या जाते त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाते अशी जनभावना आहे त्यामूळे काही दिवसात ते बदली करून घेतात परत काही महिण्यांनी शिक्षा भोगण्यासाठी कोणत्या तरी अधिका-याला पाठविल्या जाते असा खेळ जिल्ह्यात सातत्याने चालू असतो व महत्वपूर्ण अधिका-यांची पदे महिणामहिणो रिक्त असतात त्यामूळे आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात पाठवावे. असेही या निवेदनात म्हटले आहे.
  जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त पद, गडचिरोली उपविभागीय अधिकारी पद, गडचिरोली नगर परिषद मुख्याधिकारी पद व वेगवेगळ्या विभागातील दोन तीन डझन अधिका-याचे पद रिक्त असून या ठिकाणी प्रभारीकडे थातूर मातूर सारवा सारव करण्यासाठी पदभार देण्यात आले आहे त्यामूळे एक ना धड भाराभर चिंद्या अशी प्रशासकिय यंत्रणेची गत झाली आहे त्यामूळे  जिल्ह्यातील रिक्त अधिका-यांचे पद विनाविलंब भरण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments