महाराष्ट्र शासनाचे वतीने "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" निःशुल्क नाट्य प्रयोग



गडचिरोली : झाडीपट्टी व नागरी रंगभूमीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेले चुडाराम बल्हारपूरे लिखीत व अनिरुद्ध वनकर दिग्दर्शीत "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या तीन अंकी नाटकाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत या नाटकाचा निःशुल्क प्रयोग कुरखेडा (जिल्हा गडचिरोली) येथे ३ नोव्हेंबरला "लोकजागृती संस्थेतर्फे सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, अशोकजी नेते, खासदार, चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्र, कृष्णा गजबे, आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र. डॉ. देवराव होळी, आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे उपस्थित राहणार आहेत.

सर्वसामान्य जनतेसाठी हे नाटक शासनाचे वतीने विनामूल्य दाखविण्यात येणार आहे. असे विकास खारगे, प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, व विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी कळविले आहे.

   या नाट्यप्रयोगात सिने. भारत रंगारी, प्रविण भसारकर, निखिल मानकर, अभिषेक मोहूर्ले, अरविंद खंदारे, प्रमोद दुर्गे, अखिल भसारकर, रविंद्र धकाते, जुगल गणवीर, रुपाली खोब्रागडे, राणी धुळे, स्मिता धुळे, जागृती निखारे, बाल कलावंत, रुचीत निनावे इ. कलावंतांसह एकूण ३५ कलावंत काम करणार आहेत.
-------------------------------------------------------- 
गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा व बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्षासाठी दिलेल्या लढ्याची कथा आपल्याकडील जनमानसां  पर्यंत पोहचावी,  जसे विर उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, तंट्या भिल्ल यांचे चरित्र आपणांस माहीत आहे, तसेच गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारकांची क्रांतीगाथा माहित व्हावी, हा या नाटकाच्या लेखनाचा व सादरीकरणाचा हेतू असल्याचे  नाटकाचे दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर व नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी  "लोकप्रवाह'शी झालेल्या चर्चेत सांगितले.

Post a Comment

0 Comments