ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मंडल यात्रा काढावी : ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर



मंडल यात्रा गडचिरोलीत दाखल, महिलांनी दिला “एक राखी मंडल के लिये”चा संदेश

गडचिरोली : मंडल आयोगाच्या विरोधात भाजपने पूर्वी कुमंडल यात्रा काढून ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली होती, हे देशाला माहिती आहे. आज ओबीसींसाठी खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंडल यात्रा काढावी, असे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी आज मंगळवार (ता.12) विश्रामगृहात आयाेजित पत्रकार परिषदेतून थेट  मुख्यमंत्र्यांना आव्‍हान केले. 

९ ऑगस्ट रोजी नागपूर येथून प्रारंभ झालेली मंडल यात्रा आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयी दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा जिल्ह्यात  पाेहचली.  त्‍यांनंतर त्‍यांनी पत्रकार परिषद घेवून  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तसेच ३५८ तालुक्यांतील गावागावांत पोहचून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणार आहे.

गडचिरोलीत यात्रेचे स्वागत जिल्ह्यातील महिला बांधवांनी “एक राखी मंडल के लिये” असा नारा देत, सहभागी बांधवांच्या हातावर राखी बांधून केले. या उपक्रमाने समाजातील एकात्मतेचा व न्याय हक्कासाठीच्या भावनेचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यार पवार, जिल्हा उपाध्यक्ष नाईन शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments