'उष्माघातापासून सावध रहा, स्वतःची काळजी घ्या!': आरोग्य विभागाचे आवाहन

 

​जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत 'उष्माघात कक्ष' सज्ज

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम यांनी नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले आहे.


​ जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज

​उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय (General Hospital), सर्व ग्रामीण रुग्णालये (RH) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) स्तरावर स्वतंत्र 'उष्माघात कक्ष' स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये विशेष बेड, कुलर/एसी, पुरेशा प्रमाणात ओआरएस (ORS), आयव्ही फ्लूइड्स आणि आपत्कालीन औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे म्हणाले की, "गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आम्ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. उन्हाळ्यात शेतात किंवा कामावर जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणालाही चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास, घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आम्ही आशा स्वयंसेविकांमार्फत घराघरात जनजागृती मोहीम देखील राबवत आहोत.

​ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या की, "वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उष्माघाताचा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे. गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय आणि सर्व ग्रामीण रुग्णालये उष्माघाताच्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सर्व वैद्यकीय अधीक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.


उष्माघाताची प्रमुख लक्षणे
​शरीराचे तापमान अचानक वाढणे, चक्कर येणे किंवा मळमळ होणे.
​असह्य डोकेदुखी, अत्यधिक तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे.
​श्वास लागणे आणि हृदयाचे ठोके वाढणे.
​गंभीर परिस्थितीत भ्रम होणे किंवा बेशुद्ध पडणे.

काय करावे
​बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
​पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी वारंवार प्यावे.
​हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे परिधान करावेत.
​शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत सावलीत किंवा घरातच थांबावे.

काय टाळावे
​कडक उन्हाच्या वेळी (विशेषतः दुपारी २ ते ४) शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.
​लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात कधीही सोडू नका.
​मद्य, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली शीतपेये टाळावीत.
​अनवाणी बाहेर पडू नका; नेहमी चप्पल किंवा बुटांचा वापर करा.

विशेष आवाहन
उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. कोणालाही उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्यांना त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल करावे किंवा १०८/१०२ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments