शार्पशुटरच्या नजरेपासून नरभक्षी वाघ दूरच




- वाघाची दहशत कायम
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली व वडसा वनविभागात मागील दिड वर्षांपासून नरभक्षक वाघाने दहशत निर्माण करीत अनेकांचा बळी घेतला आहे. त्यानंतर ग्रामस्थांमधून वनविभागाप्रती रोष व्यक्त केला जात असून वाघाला पकडण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, सरकारने नरभक्षी वाघाला पकडण्याचा आदेश दिल्यानंतर १० दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथून शार्पशुटरचे पथक वडसा वनविभागात दाखल झाले आहेत. मात्र, अजूनपर्यंत  नरभक्षी वाघ शार्पशुटरच्या नजरेपासून दूरच राहिले आहे. 
.......
तीन दिवसांत दोन बळी 
सध्या वडसा व गडचिरोली वनविभागात नरभक्षक वाघांची दहशत कायम आहे. शार्पशुटरची टीम 10 दिवसांपूर्वी वडसा वनविभागात दाखल झाली आहे. मात्र अजूनपर्यंत वाघाला पकडण्यात यश आले नाही. मात्र, दुसरीकडे नरभक्षक वाघाची दहशत थांबण्याचे नाव घेत नसून अवघ्या तीन दिवसात वाघाने दोन जणांचा बळी घेतला आहे. पहिली घटना देसाईगंज तालुक्यातील उसेगाव व दुसऱ्या घटनेत गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील एका गुराख्याचा  जीव गेला आहे. 
........
लोकांमध्ये आक्रोश 
मागील दिड वर्षांपासून गडचिरोली व वडसा वनविभागात नरभक्षी वाघाने धुमाकूळ माजविला आहे. यापूर्वीही वनविभागाने ताडोबासह नागझिरा येथील आरआरटी पथकाला नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी पाचारण केले होते. या टीमच्या सदस्यांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबवूनही नरभक्षी हाती लागला नाही. आता पुन्हा ताडोबाचे शार्पशुटर पथक वडसा वनविभागात दाखल झाले आहे. मात्र, अजूनपर्यंत नरभक्षक वाघाला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे व्याघ्र बाधित क्षेत्रातील ग्रामस्थांतून आक्रोश व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments